Sunday, May 8, 2011

सुरेश भट

आज भटांची गझल आठवली आणि स्वतःच्या काव्याविषयीचे त्यांचे हे शब्दही..मराठी काव्यक्षितिजावर एखाद्या वीजेच्या डोळे दिपवुन टाकणार्‍या कडकडाटाप्रमाणे तळपुन गेलेल्या या कवीला आणि त्यांच्या गझलेला स्मरुन...

माझीया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे
वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे

स्फंदने ज्ञानेश्वरांची माझीया वक्षात व्हावी
इंद्रियावाचुन मीही इंद्रिये भोगुन घ्यावी

एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला
नामयाहाती बनावे हे जीणे गोपालकाला

माझियासाठी जगाचे रोज जाते गरगरावे
मात्र मी सोशीन जे जे ते जनाईचे असावे

मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे
चोखवे वारात माझ्या मी मला वाहुन द्यावे

याविना काही नको रे एवढे दे पांडुरंगा
याचसाठी मांडला हा मी तुझ्या दारात दंगा

गदिमा

चंद्रभारल्या जीवाला, नाही कशाचीच चाड
मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड !

गीतरामायणाविषयीच्या आपल्या मनोगतातील गदिमांचे हे शब्द त्यांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेची साक्ष देतात. या भारलेल्या झाडानी मराठी मनांवर अनेक वर्ष अक्षरशः गारुड केल.ग.दि.माडगुळकर हे नाव ऐकल्यावर कौतुकादरानी उसळुन न येणार मराठी मन क्वचितच असेल. साहित्याच्या क्षेत्रात कथा, लघुकथा, प्रवासवर्णन, भाषांतरीत साहित्य, बालवाङमय, कादंबरी, गीतरामायण, कविता,काव्यकथा,संगितिका आणी चित्रपटाच्या क्षेत्रात चित्रपटगीत, कथा, पटकथा, संवाद, अभिनय अशी मुशाफिरी पाहिली की थक्क व्हायला होत.

बाबुजी - सुधीर फडके आणी गदिमा ही मराठी भावसंगितातील दोन उत्तुंग शिखर. शब्दसुरांच्या या सुवर्णयोगातुन अनेक भावमधुर गाणी आणि गीतरामायणासारखी अजरामर कलाकृती निर्माण झाली. 'विठ्ठला तु वेडा कुंभार...', 'जग हे बंदिशाळा...','नसे राऊळी वा नसे मंदिरी...','संथ वाहते कृष्णामाई..','सांग तु माझा होशील का...','या चिमण्यांनो परत फिरा रे...' या सारख्या असंख्य गीतांनी मराठी रसिकांना वेड लावल.

साधे, सोपे पण अतिशय अर्थगर्भ आणि नादमय शब्द ही या कविची ताकद होती. असामान्य शब्दप्रतिभेच देण लाभलेल्या या महाकविसमोर शब्द हात जोडुन उभे रहात.अशा शब्दांमधे विलक्षण ताकद असते. चिरंजिवित्वाच वरदान लाभलेल्या या शब्दांनी गदिमांची अनेक गीत अजरामर झाली. गदिमांच्याच शब्दात सांगायच झाल तर,

झंकारल्या कंठवीणा आले चांदण्याल सुर
भावमाधुर्याला आला महाराष्ट्रीय महापूर !

चला तर मग या भावमाधुर्याचा आस्वद घेत महाराष्ट्राच लेण असलेल्या या महाकविचं स्मरण करुयात.

चैत्रपाडवा

चैत्रपाडवा ! शिशिराची शेवट सांगत वसंताची चाहुल देणारा. हजारो वर्षांपुर्वी पृथ्वीचा आस कलला आणी या ऋतुचक्राच्या चलतचित्राला पृथ्वीच्या विशाल मंचावर सुरुवात झाली. शिशिराच्या पानगळीतुन सृजनाचा हुंकार देणारी चैत्रपालवी. फुलांच्या सुगंधानी, सपर्ण वृक्षांच्या सळसळींनी जिवंत होऊन उठलेली, तापल्या उन्हाच्या वैषाखवणव्यातुन पावसाची आस लागलेली सृष्टी. या सृजननाट्याच्या उद् घोषात येतो गुढीपाडवा !

पाडव्याला उभारलेली गुढी प्रभु रामचंद्रांच्या वनवासाचा शेवट, नववर्षाची सुरवात, चंद्रगुप्त विक्रमादित्यादी सम्राटांनी शकांवर प्राप्त केलेला विजय अश्या गोष्टींच प्रतीक आहे. गुढीवरील आंब्याची कोवळी डहाळी ही वसंत ऋतुच्या आगमनाची नांदी आहे. कडुलिंबाचा कडवट पाला वर्षारंभीच चाखुन रोजच्या धकाधकीत सामोरा येणारा कडवटपणा पचवण्याचा संदेश गुढी देते.

निसर्गाचा सृजनोत्सव, नव्याची सुरवात, होळीचे रंग आणी वाईटावरील विजयाच प्रतीक असणारा गुढीपाडवा आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणी भरभराट घेऊन येवो !

पंडीत भीमसेन जोशी

24 जानेवारी 2011. पंडीत भीमसेन जोशी नावाचा भारतीय शास्त्रीय संगीतातील अमर सूर पंचत्वात विलिन झाला. संगीत हाच ध्यास आयुष्यभरासाठी घेतलेल्या पंडितजींच आपल्यात नसणं हे अतिशय क्लेशकारक आहे.

उत्तर कर्नाटकातील गदग नावाच छोटस गाव. पंडित अब्दुल करीमखान यांची बंदिश ऐकुन 12 वर्षाचा एक मुलगा भारावुन जातो. 'अस गाता आल पाहिजे' हे ठरवुन घरातुन पळुन जातो. रेल्वेमधे विनातिकिट प्रवास करत, अनेक भल्याबुर्‍या अनुभवांना सामोर जात थेट पोचतो ग्वाल्हेरला ! त्यानंतर सुरु होतो तो संगीताच्या ध्यासानी पछाडलेला एक अदभुत सांगितिक प्रवास, सहा दशकांच्या गानतपस्येचा! सच्ची निष्ठा आणी अफाट परिश्रम माणसाला कोणत्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात ते पंडितजींच्या वाटचाली कडे पाहिल की लक्षात येत. आज पंडितजींना स्मरताना आठवतो तो त्यांचा धीरगंभीर खर्जातला स्वर, गायनाची आक्रमक शैली, अक्षरशः भारतर गाण्याच्या कार्यक्रमांसाठी त्यांनी केलेली भ्रमंती, त्यांनी गाऊन अजरामर केलेली अभंगवाणी आणी आपल्या गुरुंच्या स्मरणार्थ पुण्यात जवळजवळ पाच दशक चालवलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव नावाचा स्वरयज्ञ !

शतका शतकातुन एकदा होणार्‍या या स्वरभास्कराला सर्व रसिकांतर्फे भावपुर्ण श्रध्दांजली.

Saturday, July 31, 2010

ग. दि. माडगुळकर आणी गीतरामायण

बाबुजी - सुधीर फडके आणी ग.दि.माडगुळकर ही मराठी भावसंगीतातील उंच शिखरं. त्यांच्या सुवर्णसहयोगानी अनेक अविस्मरणीय गाणी आणी गीतरामायणासारखी अजरामर कलाकॄती निर्माण झाली . सुरवातीच्या एका गीतरामायणाच्या महोत्सवात ग.दि.मांनी पत्ररुपानी पाठवलेलं गीतरामायणाविषयीचं त्यांचं हे काव्यमय मनोगत..

अजाणतेपणे केव्हा, माता घाली बालगुटी
बीज धर्माच्या दॄमाचे, कणकण गेले पोटी

छंद जाणतेपणीचा, तीर्थे काव्याची धुंडिली
कुण्याएका भाग्यवेळी, पुजा रामाची मांडिली

देववाणीतले ओज, शीतळले माझ्या ओठी
वाल्मिकीच्या भास्कराचे, झाले चांदणे मराठी

झंकारल्या कंठवीणा, आले चांदण्याला सुर
भावमाधुर्याला आला, महाराष्ट्रीय महापुर

चंद्रभारल्या जिवाला, नाही कशाचीच चाड
मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड

- ग. दि. माडगुळकर

कथा

जी. ए. कुलकर्णींच्या पत्रांचा संग्रह (खंड १) वाचताना ( आणी त्यांच्या इंग्रजी साहित्याच्या व्यासंगाने पावलोपावली थक्क होताना..) Balzac या फ्रेंच नाटककार आणी कादंबरीकाराचा उल्लेख आला. जी. एं, ना फारसा न आवडणारा हा लेखक. पण त्याची एक कथा मात्र त्यांनी या पुस्तकात दिली आहे. ती वाचताक्षणी आवडुन गेली. ही कथा जी.एं. च्याच शब्दात जशीच्यातशी-

" एकदा जहाजातुन अनेक प्रवासी चालले होते.पण अचानक वादळ येऊन ते खडकावर आदळले. त्यानंतर किंकाळ्या ऐकु आल्या. सार्‍यांनी जिवाची आशा सोडुन प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. त्या वेळी एक चमत्कार घडला.भव्य दाढी असलेला एक तेजस्वी पुरुष त्यांच्यासमोर प्रकट झाला व म्हणाला, "मी तुम्हाला तारायला आलो आहे.माझ्या मागुन या." असे बोलुन तो पाण्यावर सहजपणे चालत किनार्‍याकडे गेला. सारे प्रवासी दॄष्टांताने भारुन त्याच्यामागे निघाले. त्यांनाही पाण्यावर चालण्याची शक्ती मिळाली, व ते देखील सुखरुपपणे किनार्‍याला लागले.पण कोंबडीच्या काळ्या पिलांत मध्येच एखादे पांढरे, sport पिलु असावे त्याप्रमाणे या घोळक्यात एक एकांडा माणुस निघाला. तो म्हणजे जहाजाचा कप्तान.त्याने किंकाळी फोडली नाही, गुडघे टेकुन प्रार्थना केली नाही, की तो त्या भव्य पुरुषामागुन भाविकतेने निघाला नाही. त्याने फुटलेल्या जहाजाच्या दोनतीन फळ्या घेतल्या व त्यांच्यावर तरंगत तो पोहत किनार्‍याकडे आला.तेव्हा त्या भव्य पुरुषाने त्याच्या खांद्यावर टिचकी मारली व म्हटले," मला तुझ्याशी बोलायच आहे." थोड्या बाजुला जाऊन तो कप्तानाला म्हणाला," हे बघ, हे सारं ठीक आहे; पण पुन्हा असा उपद्व्याप करु नको. तुझ उदाहरण पाहुन आणखी काही लोक बिघडतील. मग आमच्यासारख्यांचा अवतारच संपेल. स्वतःच्या सामर्थ्या विषयी त्यांचं अज्ञान हे तर आमचं सामर्थ्य, तेव्हा यापुढे जादा शहाणपण दाखवत जाऊ नकोस !" "

(स्त्रोतः जी.एं.ची निवडक पत्रे- खंड १, संपादन म.द. हातकणंगलेकर, श्री.पु.भागवत)